Saturday, October 9, 2010

अद्ययावत तंत्रज्ञान आत्मसात करणे हेच माध्यमांपुढील आव्हान - कुमार केतकर

पुणे, १० सप्टेंबर / प्रतिनिधी
‘मराठी भाषक वृत्तपत्रांचे भविष्यात ‘मार्केट’ वाढेल, पण त्यांचा व्यवसाय कमी होणार असल्याने वर्तमानपत्रांच्या किमती वाढविणे आवश्यक ठरणार आहे. मात्र त्यामुळे भाषक वृत्तपत्रांचे वाचक आपल्यापासून दूर जातील ही माध्यमांपुढची समस्या आहे’, अशी भीती ‘लोकसत्ता’ चे संपादक कुमार केतकर यांनी येथे व्यक्त केली. वृत्तपत्र माध्यमांचे काम भविष्यात कमी झाले, तर अन्य माध्यमांमध्ये काम करण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञान आत्मसात करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
पुणे श्रमिक पत्रकार संघ आणि पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन आणि वृत्तपत्रविद्या विभागाच्या वतीने आयोजित ‘माध्यमांपुढील पेच’ या विषयावर ते बोलत होते. कालची आणि आजची वृत्तपत्रसृष्टी या स्थितीवर अभ्यासपूर्ण भाष्य त्यांनी केले. माध्यमांपुढील पेचाचे विश्लेषण करताना केतकर यांनी प्रामुख्याने तंत्रज्ञान, वृत्तपत्रांचे अर्थकारण आणि मार्केट या तीन गोष्टींवर प्रकाश टाकला.
ते म्हणाले, ‘‘वृत्तपत्रसृष्टीत प्रामुख्याने तंत्रज्ञानही महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे वृत्तपत्रांना मोठा आधार आहे. तसेच वर्तमानपत्राच्या बाहेरील अर्थकारणाचा थेट त्यावर प्रभाव पडत असल्याने त्यालाही अनन्यसाधारण महत्त्व आहे. भविष्यात मराठी माध्यमांचा व्यवसाय कमी होऊन तो अन्य भाषांच्या वृत्तपत्रांकडे जाण्याची भीती आहे, परंतु तसे झाले तरी त्यांचे ‘मार्के ट’ वाढेल. परिणामी त्यामुळे वृत्तपत्रांच्या किमती आपल्याला वाढवाव्या लागतील. त्यामुळे आपला वाचक दूर होईल. महाराष्ट्रात सुमारे ३५ टक्के जनता ही निरक्षर आहे. ती पुढे साक्षर झाली तर ती आपला वाचक म्हणून पुढे येईल आणि त्यांना कमी किमतीत अधिकाधिक माहिती देणारे आणि त्यांचे मनोरंजन करणारे माध्यम हे वृत्तपत्र असेल. पाकिस्तान आणि बांगला देशातील वृत्तपत्रांच्या किमती या सर्वाधिक असून त्याला जबाबदार अर्थकारण आहे. त्या तुलनेत भारतात वृत्तपत्रांच्या किमती कमी आहेत. पाकिस्तानातील वृत्तपत्रांना शासकीय जाहिराती वीस टक्के मिळत असल्या, तरी त्यांच्या वृत्तपत्रांचा व्यवसाय हा कमी होतो. एकाचवेळी खेडय़ापासून जगभरातील राजकीय, सामाजिक, आर्थिक माहिती, मनोरंजन, विविध छायाचित्रे, विश्लेषण देणारे माध्यम म्हणून वृत्तपत्र खरेदी केले जाते. दुसरीकडे अडीचशे रुपयांच्या केबलच्या शुल्कात चोवीस तास सलग विविध चॅनेल्सवरून माहिती देण्यात येते. या दोन्हींची तुलना करता हे चित्र समाधानकारक आहे. उच्चशिक्षित आणि चांगली आर्थिक स्थिती असणाऱ्या वर्गाकडून कोणती वृत्तपत्रे खरेदी करायची याचा विचार केला जातो. ६० ते ६५ टक्के कु टुंबांचे उत्पन्न हे २५ हजार रुपयांपेक्षा अधिक आहे. त्यांची मुले ही इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शिक्षण घेतात. त्यामुळे त्यांच्या घरात इंग्रजी वृत्तपत्र घेतले जाते. मात्र बौद्धिकदृष्टय़ा उच्च असलेला वर्ग हाच मराठी वृत्तपत्रांकडे एक पाऊल पुढे टाकतो.’’
भविष्यात मराठी भाषेला मरण येईल अशी भीती व्यक्त केली जाते. ही शक्यता केतकर यांनी फेटाळून लावली. ‘महाराष्ट्रात १० कोटी जनता मराठी भाषा बोलते. ती इंग्लंडच्या लोकसंख्येच्या दुप्पट आहे.
त्यामुळे मराठी भाषेला तसेच मराठी माध्यमांनाही मरण नाही, असे म्हणावे लागेल’, असेही ते म्हणाले. आजचे तरुण मोबाईलवर चार ते पाच तास बोलत असतात. काही वेळ दूरचित्रवाणी पाहतात. ‘नेटसर्फिग’ लाही वेळ देतात. त्यानंतर वर्तमानपत्रांना आणि सर्वात शेवटी पुस्तकांसाठी वेळ देतात. भविष्यात वृत्तपत्रांचे काम कमी झाले, तर अन्य माध्यमांमध्ये काम करण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान नवोदित पत्रकारांना आत्मसात करावे लागेल. त्यानंतरच या क्षेत्रात ते टिकाव धरू शकतील. भविष्यात इंटनरेट, मोबाईलवर वृत्तपत्र येण्याची शक्यता आहे.
त्यामुळे आपला वाचक घसरणार नाही, मात्र वाचकाचा वर्ग वेगळा असेल. या नव्या माध्यमांमधून वृत्तपत्राचा आशय वाचण्यास वाचकोंना आवडेल म्हणून या तंत्रज्ञानाचे ज्ञान आत्मसात करणे आवश्यक आहे, असे मतही त्यांनी नोंदविले.
या वेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे कुमार केतकर यांनी दिली. वृत्तपत्र विद्या विभागाच्या प्रमुख प्रा. उज्ज्वला बर्वे यांनी सूत्रसंचालन केले. पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष योगेश कुटे यांनी आभार मानले. (साभार : लोकसत्ता)

    0 comments:

    About This Blog

    Lorem Ipsum

      © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

    Back to TOP